वॅसीली मित्रोखीन, ख्रिस्तोफर अँड्रू - द मित्रोखीन अर्काइव २ ★★★★

वॅसिली मित्रोखिन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केजीबीच्या पहिल्या मुख्य संचालनालयाच्या परदेशी हेरगिरी करणाऱ्या विभागामधून केली. जेव्हा मित्रोखिन यांनी निकिता ख्रुश्चेव्हच्या एका गुप्त भाषणावर टीका केली तेव्हा त्यांना ऑपरेशन्समधून अभिलेखागारात (डॉक्युमेंट अर्काइवज विभागात) स्थानांतरित करण्यात आले. १९६० च्या अखेरीस, केजीबीचे लुब्यांका हे मुख्यालय अपुरे पडू लागल्याने मॉस्कोबाहेर यासेनेव्हो येथे एक नवीन इमारत बांधली. या इमारतीला मुख्य संचालनालयाचा दर्जा देण्यात आला आणि तेथून सर्व परदेशी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात येऊ लागले. त्या वेळी अभिलेखागार विभागाचे प्रमुख असलेले मित्रोखिन यांना कागदपत्रांची यादी तयार करण्याचे आणि नवीन मुख्यालयात त्यांचे सुव्यवस्थित हस्तांतरण पाहण्याचे काम सोपवण्यात आले. भव्य अभिलेखागाराचे हस्तांतरण पूर्ण व्हायला १९७२ ते १९८४ अशी १२ वर्षे लागली.

या गदारोळाचा फायदा घेऊन मित्रोखिन यांनी त्यातली काही कागदपत्रे आणि त्यांतील मजकूर चोरला. १९९० मध्ये सोविएत संघाचे विघटन झाले. त्याचा फायदा घेऊन तो लाटव्हियाला गेला आणि त्याने तेथील ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांशी संपर्क साधला. त्याच्या कागदपत्रांची गुणवत्ता लक्षात आल्यावर त्याला त्याच्या परीवारासह ब्रिटनला आश्रय देण्यात आला. सुमारे २५००० पानांच्या त्याच्या संग्रहात जगभर केजीबीने केलेल्या अत्यंत गुप्त कारवायांची माहिती होती. ती त्यांनी ख्रिस्तोफर अँड्रू यांच्या मदतीने १९९९ मध्ये प्रसिद्ध केली. या पुस्तकाने पाश्चात्य गुप्तचर वर्तुळात खळबळ उडवून दिली कारण हजारो केजीबी फायलींमधून कॉपी केलेल्या या माहितीची अधिकृतता आणि अचूकता सिद्ध झाली आणि हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

भारताच्या बाबतीत म्हटले तर केजीबी साठी भारत म्हणजे एक मोकळे रान होते. पुस्तकात संपूर्ण भारत विकण्यासाठी ठेवला होता असे वक्तव्य केलेले आहे. कुठल्याही राजनैतिक पक्षाला पार्टी फंड देऊन विकत घेता येत होते. अनेक महत्वाच्या व्यक्ति पैशाच्या बदल्यात भारताची गोपनीय माहिती विकायला तयार होते. हनीट्रॅपचा तर काही हिशेबच नाही. १९७८ मध्ये, केजीबीचे भारतात ३० पेक्षा जास्त एजंट काम करत होते, त्यापैकी १० भारतीय गुप्तचर अधिकारी होते. तत्कालीन कॉँग्रेस पक्ष आणि कामुनिस्ट पक्षांचा भारत विरोधी कारवायांत मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला होता. अशा एक ना अनेक खुलाशांनी आपण थक्क होऊन जातो. प्रत्येक भारत प्रेमीने हे पुस्तक वाचले पाहिजे.

हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर काही काळ भारतात गदारोळ उठला होता. पण तो अल्पकाळात शांत झाला. भारतीय लोक देशाच्या बाबतीत किती गेंडयाच्या कातडीचे आहेत हे यावरून दिसून येते. हा प्रकार सध्याच्या काळातही चालू असावा असे दिसते. परकीय गुप्तचर संस्था भारतात भारतविरोधी कारवायांत भारतीयांचाच उपयोग करून धुमाकूळ घालत असतील, जे एखादा आणखीन दूसरा मित्रोखिन आपल्याला आणखी दहा-पंधरा वर्षांनी सांगेल. तोपर्यंत हे पुस्तक वाचून आपले मनोरंजन करण्यास काही हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★

Short Books Recommendations